|| श्रींचे अवतारकार्य ||

मागील पान

सायंदेवाचे दुष्ट यवनापासुन रक्षण व गुरूसेवेविना ज्ञानप्राती नाही याचा बोध
यानंतर पुढील मार्ग आक्रमीत असता गोदावरीतीरी असलेल्या वासरग्रामी सांयदेवाची व महाराजांची पहिली भेट झाली. पोटशुळाच्या व्यथेमुळे जर्जर झालेला ब्राम्हण जीव देण्यास जात असता महाराजांनी त्याला बरोबर घेतले व सायंदेवाच्या घरी आपण भिक्षा घेतेवेळी त्याला प्रथम पोटभर मिष्टान्न खावयास देऊन त्या ब्राम्हणाची पोटशुळाची व्यथा कायमची नष्ट केली व त्याच प्रमाणे यवनराजापासून सायंदेवाचे रक्षण केले. त्याला पुढे गाणगापुरास आपल्या भेटीस बोलाविले. येथून महाराज परळी वैजनाथास गेले. परळी वैजनाथ येथे मुक्काम झाला असता आपल्या गुरूंवर रागावून व त्यांचा त्याग करून स्वतःस 'मुनी' असे म्हणवून घेणा-या एका ब्राह्मणपुत्रास धौम्यमुनींच्या तीन शिष्यांची कथा सांगून त्याला गुरूचे श्रेष्ठत्व व माहात्म्य पटवून दिले. आपल्याकडून गुरूद्रोहाचे महान पाप घडल्याबद्दल त्याला अंतःकरणापासून पश्चात्ताप झाला आहे असे पाहून महाराजांनी त्या ब्राह्मणपुत्राचा उध्दार केला. याच ठिकाणी महाराजांनी सर्व शिष्यांना बोलावून त्या सर्वांना तीर्थयात्रेस पाठवीले व बहुधान्यनामसंवत्सरी आमचे वास्तव्य श्रीशैल्यपर्वतावर असेल; त्यावेळी तुम्ही सर्वांनी माझ्या भेटीस यावे असे त्यांना सांगितले.

मतिमंद कुमाराचा उध्दार 64 योगिनींना वरदान व वेल उपटुन दैन्य हरण
यानंतर महाराज औदुंबर भिल्लवाडीस आले व तेथे त्यांनी एक चातुर्मास मुक्काम केला. भुवनेश्वरीच्या देवळात स्वतःची जीभ कापून देवीसमोर धरणे धरून बसलेल्या एका कोल्हापूरच्या ब्राह्मणास देवीने महाराजांकडे जाण्याचा आदेश दिला. देवीने अखेर आपणांस एका मानवाकडेच पाठविले असा किंतू मनात बाळगून आलेल्या त्या ब्राह्मणास त्या किंतूची जाणीव करून देऊन त्याच्यावर महाराजांनी कृपा केली. त्यास जिव्हा व विद्या दान केली. तेथून महाराज नरसोबांच्या वाडीस गेले. त्या ठिकाणी कृष्णाकाठी व पंचगंगेच्या आसमंतात घनदाट जंगल होते. या जंगलात रामचंद्र तपस्वी या नावाचे एक तपस्वी महाराजंच्या दर्शनास्तव सतत तीस वर्षांपासून उग्र तपश्चर्येचे आचरण करीत होते. महाराजंनी त्या दर्शनेच्छू तपस्व्याला दर्शन देऊन त्याच्या इच्छेनुसार त्याला जिवंत समाधी दिली. ही समाधी श्रींच्या पादुकांच्या पश्चिमेस अद्यापही आहे.

महाराजांचे वास्तव्य वाडीस असताना चौसष्ट योगिनी महाराजांना आरती ओवाळण्याकरिता त्यही येत असत व महाराज त्यांच्याबरोबर कृष्णेच्या पात्रात त्यांच्या घरी भिक्षेस जात असत. एके दिवशी हे दृश्य एका शेतरक्षकाने पाहीले व तोही महाराजांच्या मागोमाग योगिनींच्या घरी गेला व महाराजांबरोबर परत आला. ही घटना महाराजांनी पाहिली तेव्हा 'तुझे कल्याण होईल' असा त्याला आशिर्वाद दिला. तथापि त्याने या गोष्टीची वाच्यता व परिस्फोट कोठेही करू नये अशी सूचना दिली.

अमरापूरच्या दक्षिणेस असलेल्या अलास या गावी जोशी वृत्तीने राहणारे एक बहिरंभट या नावाचे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण होते. ते महाराजांस जाता - येता नमस्कार करीत व महाराज 'नारायण' असे म्हणून तिसाद देत. अव्याहत बारा वर्षेपर्यंत असा उपक्रम चालू होता. त्यानंतर महाराजांनी त्या ब्राह्मणावर अनुग्रह करून 'मी येथे लोककल्याणार्थ मनोहर पादुका ठेवतो त्याची पूजा तू वंशपरंपरा करावी; तू आज ऐशी वर्षाचा असलास तरी तुला एक पुत्र होईल व त्या पुत्राला पुढे चार पुत्र होईपर्यंत तुला दीर्घायुष्य लाभेल.' असा आशिर्वाद दिला व गुरूद्वादशीस त्याच्याकडून शेवटची भिक्षा घेऊन महाराज तेथेच गुप्त झाले; आणि म्हणूनच नरसोबाच्या वाडीस गुरूद्वादशी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. गुप्त होण्यापूर्वी चौसष्ट योगिनींच्या विनंतीवरून महाराजांनी अन्नपूर्णेस त्या ठिकाणी ठेविले. गुप्त होण्यापूर्वीची गोष्ट. महाराज एके दिवशी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेस गेले असता तेथे त्याच्या दारी असलेल्या घेवडयाच्या वेलाच्या शेंगांच्या भाजीची भिक्षा त्यांना मिळाली. महाराजांना ती अत्यंत गोड लागली. परत जाताना त्या ब्राह्मणाच्या दारी असलेला तो घेवडयाच्या शेंगांचा वेल महाराजांनी उपटून टाकला. आपल्या उपजीविकेचे एकमेव व अल्पसे साधन असलेला तो वेल महाराजांनी का उपटून टाकावा ह्या गुह्याचे आकलन ब्राह्मण स्त्रीस न झाल्यामुळे तिला प्रथम अतिशय वाईट वाटले. आपल्या पूर्वसंचितानुसार चांगल्या - वाईट गोष्टी आपणांस प्राप्त होत असतात परमेश्वराला दोष देण्यात अर्थ नाही असे सांगून त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीची समजूत घातली व त्या वेलीचे शिल्लक राहीलेले मूळ खणून काढून फेकून द्यावे म्हणून त्याने खणण्यास प्रारंभ केला. तोच तेथे त्याला एक द्रव्याचा ठेवा सापडला अशा रीतीने महाराजांनी त्या ब्राह्मणाचे दारिद्रय कायमचे दूर केले.
मागील पान